तुमच्या आयुष्यात असं कधी झालंय का, की एखादी व्यक्ती तुम्हाला फक्त १० मिनिटांसाठी भेटली, पण त्या १० मिनिटांच्या गप्पा एकदम अविस्मरणीय झाल्या?
आपण नेहमी ‘लाँग टर्म’ नात्यांच्या मागे धावतो, पण कधी कधी काही क्षणांचा सहवासही आयुष्यभराची शिदोरी देऊन जातो.
निसर्गातलं ‘चेरी ब्लॉसूम’चं (Cherry Blossom) उदाहरण घ्या ना!
वर्षातून एकदाच ही फुलं येतात, पण जेव्हा येतात तेव्हा अख्खा परिसर त्यांच्या रंगाने न्हाऊन जातो. जरी त्यांचा सहवास फक्त महिनाभराचा असतो, तरी जेव्हा ती फुलं येतात तेव्हा तो पूर्ण परिसर सुंदर होऊन जातो. पण जेव्हा ती गळून पडतात, तेव्हा त्या रिकाम्या फांद्या मनाला एक हुरहूर लावून जातात आणि आपण पुढच्या वर्षाची वाट पाहू लागतो. त्या रिकाम्या फांद्या हे शिकवून जातात की आपण कोणाच्याही आयुष्यात गेलो तर ‘आनंदाचा बहर’ आणि ‘खुशीची लहर’ बनून जायला हवे. जेणेकरून आपण तिथून गेल्यावर मागे फक्त ‘सुंदर आठवणी’ उराव्यात.
आपणही आपल्या आयुष्यात असंच असायला हवं का?
आपण कोणाच्याही आयुष्यात गेलो, मग ते ऑफिसमधील मित्र असो किंवा प्रवासात भेटलेला एखादा अनोळखी व्यक्ती, आपण त्या चेरी ब्लॉसूमसारखं फुलायला हवं.
कधी कधी घरी एखादी व्यक्ती येते, थोडा वेळच थांबते पण घराचे पूर्ण वातावरण बदलून जाते.
सगळ्यांशी मनमोकळेपणाने हसून खेळून बोलते, आनंदाची एक लहर पसरवून जाते आणि निघून जाते. ती व्यक्ती गेल्यावरही आपल्याला वाटते, “अरे, किती मस्त वाटले! आता परत कधी येणार?”
कधी कधी एखाद्या व्यक्तीसोबत ५ मिन चॅट केले किंवा फोन वर बोलल्यानंतर “मेरा तो दिन बन गया” अशी फीलिंग येते.
आपल्याला इतरांच्या आयुष्यात ‘आनंदाचा बहर’ बनून येता आलं पाहिजे. एखाद्याला भेटल्यावर त्याला आपल्या सहवासातून आनंद मिळायला हवा आणि आपण गेल्यावर त्याच्या मनात आपल्या ‘पुढच्या भेटीची आस’ असायला हवी.
शेवटी काय तर, नातं किती वर्ष टिकतंय यापेक्षा, त्या नात्यात तुम्ही किती ‘हवे हवेसे’ आहात, हेच सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. मग तो सहवास काही क्षणांचा का असेना, तो आयुष्यातील ‘बेस्ट’ क्षण असायला हवा.
आता मला सांगा, तुमच्या आयुष्यात अशी कोणती ‘चेरी ब्लॉसूम’ व्यक्ती आहे, जिच्याशी थोडा वेळ बोलले तरीही तुमचा दिवस आनंदात जातो? कमेंट्समध्ये नक्की सांगा!
-अमृता मोरे



