सकाळी अलार्म वाजल्यापासून रात्री डोळे मिटेपर्यंत आपण सगळेच एका न संपणाऱ्या शर्यतीत धावत असतो, नाही का? ऑफिसचे टार्गेट्स, घरची कामं, ट्रॅफिक आणि त्यातून उरला सुरला वेळ आपण सोशल मीडियावर घालवतो. पण कधी शांतपणे बसून विचार केलाय का, की या सगळ्यात आपण ‘स्वतःला’ कुठे हरवून बसलोय?
आयुष्याच्या या दगदगीत जेव्हा आपल्याला थोडीशी उसंत मिळते, तेव्हाच आपल्याला खऱ्या अर्थाने स्वतःची ओळख होते. जेव्हा ही उसंत मिळते तेव्हा आपल्याला भेटायला येतो तो म्हणजे ‘एकांत’.
कल्पना करा, बाहेर पाऊस पडतोय किंवा संध्याकाळची शांत वेळ आहे. तुमच्या हातात वाफाळलेला चहाचा कप आहे आणि कानात तुमचं आवडतं गाणं मंद आवाजात वाजतंय. अशा वेळी मोबाईल बाजूला ठेवून जेव्हा आपण बसतो, तेव्हा हळूहळू मनातील गोंधळ थांबतो आणि विचार शांत होतात. आपण तासंतास अशाच शांततेत स्वतःशी गप्पा मारत बसू शकतो.
एकांत म्हणजे एकटेपण नाही. त्याच्या सोबत मित्रासारख्या गप्पा मारून तर बघा. तो खूप साऱ्या प्रश्नांची उत्तरे देऊन जातो. न सुटलेली कोडी अशा वेळी सुटतात. अचानक एखादी सुखद आठवण चेहऱ्यावर smile घेऊन येते. मनावरची ओझी इथे हलकी होतात. कोणासोबत न बोलता येणाऱ्या, मनात सलणाऱ्या गोष्टी इथे मनमोकळे बोलतो तेव्हा खरंच हलकं वाटू लागते.
जेव्हा रात्रीच्या वेळी हलकं चांदणं सोबत असतं आणि अचानक गार वाऱ्याची एखादी झुळूक स्पर्श करून जाते, तेव्हा एक वेगळाच आनंद मिळतो, अशा वेळी आपण आणि आपला एकांत खऱ्या अर्थाने एकत्र हसतो आणि मनावरचा सगळा ताण हलका होतो. ती सुखद शांतता खरंच मनाला हवी हवी वाटते. हे सगळं या धावपळीच्या आयुष्यात किती दुर्मिळ झालंय, नाही का?
आज एक प्रयत्न करून बघा, दिवसभरातले फक्त १० मिनिटं स्वतःसाठी काढा. गॅलरीत किंवा खिडकीपाशी बसा, चहाचा आनंद घ्या आणि तुमच्या एकांताला भेटा.
विश्वास ठेवा, स्वतःला भेटणं हे जगातील सर्वात मोठं सुख आहे!
-अमृता मोरे



