पूर्वी मला असं वाटायचं की, कुणी चुकीचं बोललं किंवा माझ्याबद्दल गैरसमज केला तर त्याला उत्तर दिलंच पाहिजे. समोरच्याला पटवून दिल्याशिवाय मन शांत व्हायचं नाही. अनेकदा एखाद्या छोट्या गोष्टीवरही वाद वाढायचे.
पण जसजसं वय, अनुभव आणि आयुष्य शिकवत गेलं, तसतसं एक गोष्ट लक्षात आली. प्रत्येक वेळी स्वतःचं म्हणणं सिद्ध करणं गरजेचं नसतं.
आजही कधी व्हॉट्सॲप ग्रुपवर कुणी चुकीची माहिती टाकतो, कधी कुणी माझं मत समजून घेत नाही, तर लगेच उत्तर द्यावंसं वाटत नाही. मेसेज वाचते , हसते आणि फोन बाजूला ठेवून आपल्या कामाला लागते.
कारण आता समजलंय की प्रत्येकाला समजावून सांगणं आपल्या हातात नसतं. काही लोकांना आपण कितीही सांगितलं तरी ते त्यांच्याच मतावर ठाम असतात.
आणखी एक गोष्ट शिकायला मिळाली. “माझं चुकलं” हे दोन शब्द बोलायला धैर्य लागतं. पण ते बोलल्यावर मन खूप हलकं होतं. आता त्यात कमीपणा वाटत नाही.
आजकाल मला वाद जिंकण्यापेक्षा मनाची शांती जास्त महत्त्वाची वाटते. कारण एखादा वाद जिंकलो तरी मन अस्वस्थ असेल, तर त्याचा उपयोग काय?
लोक आपल्याबद्दल काय विचार करतील, कोण काय बोलेल, कोण चुकीचं समजेल याचीही आता फारशी चिंता वाटत नाही. कारण प्रत्येकाच्या नजरेत चांगलं राहणं शक्यच नसतं.
हळूहळू लक्षात आलं की चूक आणि बरोबर यांच्या पलीकडेही एक छान जग असतं. तिथे स्वतःला सिद्ध करण्याची धडपड नसते. तिथे असते फक्त मनाची शांतता.
आता प्रत्येक वादात जिंकण्याची इच्छा राहिलेली नाही. काही गोष्टी सोडून देण्यातही एक वेगळा आनंद असतो.
तुमचंही असं झालंय का? कधी एखादा वाद जिंकण्याऐवजी शांत राहणं तुम्ही निवडलं आहे का?



