कधी असं झालंय का, की तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी जीवाचं रान केलंय आणि ऐन वेळी सगळं उलटच घडलंय? अशा वेळी आपल्याला संताप येतो, चिडचिड होते किंवा नैराश्य येते. पण विचार करा, जर आपण या परिस्थितीला वेगळ्या नजरेने बघू शकलो तर?
आपल्या आयुष्यात ‘मन’ आणि ‘वास्तव’ यांच्यात कायम एक युद्ध सुरू असतं. आपण मनामध्ये एक चित्र रंगवतो आणि वास्तवात मात्र वेगळंच काहीतरी समोर येतं. म्हणतात ना you plan & god laugh ….
खरे प्रगल्भ होणे म्हणजे काय?
भावना माणसाला जिवंत ठेवतात, यात शंकाच नाही. पण त्या भावनांवर नियंत्रण मिळवता येणं, हेच खरं प्रगल्भ (Mature) होणं असतं. आपण अनेकदा आपल्या भावनांच्या आहारी जातो. आपल्याला वाटतं की:
- प्रत्येक वेळी गोष्टी माझ्या मनासारख्याच घडल्या पाहिजेत.
- समोरच्याने मला समजूनच घेतलं पाहिजे.
- माझ्या भावनांना नेहमीच किंमत मिळाली पाहिजे.
जेव्हा आपण या हट्टाचा त्याग करतो, तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने मजबूत व्हायला सुरुवात होते.
समजा, तुम्ही एका प्रोजेक्टसाठी खूप मेहनत घेतली आहे, पण बॉसने मीटिंगमध्ये तुमच्या कामाचे कौतुक करण्याऐवजी त्यात काही चुका काढल्या. अशा वेळी आपल्याला अपमान वाटतो किंवा दुर्लक्ष झाल्याची भावना मनात येते. हीच ती वेळ असते जिथे ‘मन’ आणि ‘वास्तव’ यांची टक्कर होते. सामान्य माणूस इथे चिडतो किंवा रडतो. अशा वेळी लगेच रागाने प्रतिक्रिया देण्याऐवजी थोडं शांत राहून परिस्थिती समजून घेणं महत्त्वाचं असतं. आपल्या भावनांना योग्य दिशा दिली, तर त्याच अनुभवातून माणूस अधिक मजबूत आणि प्रगल्भ बनतो.
परिस्थितीचे गुलाम होऊ नका –
आयुष्य प्रत्येक क्षणी आपल्या मनाप्रमाणे वागत नाही; कधी अपमान मिळतो, कधी अपेक्षाभंग होतो. पण या परिस्थितीला आपण कशी ‘प्रतिक्रिया’ देतो, हे आपल्या हातात असतं. जेव्हा आपण स्वतःला सावरण्याचे कौशल्य आत्मसात करतो, तेव्हा आयुष्याच्या व्यासपीठावरचा अभिनय खूप सोपा होऊन जातो.
स्वयं-संवाद (Self-Talk): जेव्हा गोष्टी मनासारख्या घडत नाहीत, तेव्हा स्वतःला विचारा – “या परिस्थितीवर माझं नियंत्रण आहे का?” नसेल, तर ती स्वीकारणं हेच शहाणपण आहे.
अपेक्षांचा ओझं कमी करा: आपण जेवढ्या जास्त अपेक्षा इतरांकडून ठेवतो, तेवढेच आपण दुबळे होतो.
निवड तुमची आहे: प्रत्येक वेळी ‘रिएक्ट’ होण्यापेक्षा ‘रिस्पॉन्स’ देण्यावर भर द्या.
जेव्हा माणूस परिस्थितीचा गुलाम राहत नाही, तेव्हा प्रत्येक कृती ही केवळ एक प्रतिक्रिया नसून ती त्याच्या समजूतदारपणाची एक जाणीवपूर्वक केलेली निवड असते.
तुम्ही कधी अशा परिस्थितीचा सामना केला आहे का जिथे तुमच्या समजूतदारपणाने एखादी कठीण परिस्थिती सोपी झाली?
तुमचे अनुभव कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा आणि हा लेख तुमच्या त्या मित्राला पाठवा ज्याला सध्या थोड्या मानसिक बळाची गरज आहे!
अमृता मोरे



