एखाद्याने तुमचा विश्वास तोडला की असं वाटतं की काळजाचा एक तुकडाच कुणीतरी कापून नेलाय, बरोबर ना? मनात एकच प्रश्न येतो, ज्या व्यक्तीने आपल्याला आपलंसं केलं, आपण सर्वस्व झोकून ज्यांच्यावर विश्वास ठेवला, त्यांनी आपला विचार न करता तो विश्वास एका क्षणात का तोडला? आणि मग प्रश्न उरतो, ‘पुन्हा कोणावर विश्वास ठेवायचा का?’
या प्रश्नाचं उत्तर ‘हो’ किंवा ‘नाही’ असं देता येत नाही, कारण ते पूर्णपणे परिस्थितीवर अवलंबून असतं. पण एक गोष्ट लक्षात घ्या, दुसऱ्यावर विश्वास ठेवण्यापूर्वी आपल्याला स्वतःवर विश्वास असणं खूप गरजेचं आहे. तो विश्वास असा असावा की, उद्या समोरच्याने जरी विश्वासघात केला, तरी आपण डगमगणार नाही. आपल्या डोळ्यातलं पाणी हा त्या समोरच्या व्यक्तीच्या विश्वासघाताचा ‘विजय’ असता कामा नये. आपण इतकं खंबीर असावं की समोरच्याने विश्वास तोडला तरी आपण स्वतःला सावरू शकू.
समजा, तुमचा तुमच्या एका जवळच्या मित्रावर खूप विश्वास होता, पण त्याने तुमचा विश्वासघात केला आता पुन्हा कोणावरही विश्वास ठेवताना तुम्ही दहा वेळा विचार कराल. पण विचार करा, एकाने विश्वास तोडला म्हणून जगातले सगळेच लोक तसे असतील का? नात्यात शंका घेऊन आपण कधीच पुढे जाऊ शकत नाही. पुन्हा विश्वास ठेवण्याचं धाडस करणं कठीण असतं, पण ते आवश्यकही असतं. मन सावरायला वेळ लागतो पण एक खरं नातं आयुष्य बदलू शकते.
विश्वास म्हणजे नात्याचा ‘श्वास’:
जसा आपण आपला पैसा, नाव, संपत्ती किंवा अगदी आपला मोबाईल जपतो, तसाच आपण इतरांनी आपल्यावर ठेवलेला विश्वासही जपला पाहिजे. कारण विश्वास हाच कोणत्याही नात्याचा श्वास असतो. जर तो श्वासच गुदमरला, तर नातं कसं टिकणार? विश्वासघात झाला तर वाटतं की आपला श्वासच अडकलाय, पण हे भीतीचं जाळं तोडून पुन्हा विश्वासाचं फूल फुलवणं गरजेचं आहे.
जर आपण विश्वासाचं हे फूल नीट जपलं, तर त्या नात्यात आयुष्यभराचा सुगंध दरवळत राहील.
तुम्हाला काय वाटतं? एखाद्याने विश्वास तोडल्यावर तुम्ही त्याला दुसरी संधी देता की तुमची दारं कायमची बंद करता?
तुमचे अनुभव किंवा विचार खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर हा लेख तुम्हाला पटला असेल, तर तुमच्या अशा मित्र-मैत्रिणींना शेअर करा ज्यांना सध्या याची गरज आहे!
अमृता मोरे



