आयुष्यात अनेक प्रकारची दुःखे असतात, पण सर्वात वाईट आणि वेदनादायी भावना ती असते जेव्हा तुम्हाला असं वाटू लागतं की, ज्या व्यक्तीशी तुम्हाला सर्वात जास्त बोलायचं आहे, त्याच व्यक्तीकडे तुमच्यासाठी आता वेळ नाही. ज्या माणसाकडे आपण आपलं मन मोकळं करायचो, तीच माणसं जेव्हा दूर जाऊ लागतात, तेव्हा मनाची होणारी तगमग शब्दांत मांडणं कठीण असतं.
प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एक व्यक्ती असते जी आपली ‘सेफ प्लेस’ असते. त्यांच्याशी बोलताना आपल्याला कशाचीही भीती वाटत नाही. पण हळूहळू परिस्थिती बदलू लागते आणि तीच व्यक्ती आपल्याला विचित्र किंवा परकी वाटू लागते.
उदा. समजा, आधी तुम्ही ऑफिसमधून किंवा कॉलेजमधून आल्यावर सर्वात आधी त्या व्यक्तीला फोन करून तुमच्या दिवसाबद्दल सांगत होतात. पण आता फोन करण्यापूर्वी तुम्ही दहा वेळा विचार करता. “त्यांना आवडेल का?”, “ते चिडतील का ?” किंवा “मी त्यांना उगाच त्रास तर देत नाहीये ना?” असे विचार मनात येतात.
जेव्हा समोरच्या व्यक्तीचे रिप्लाय छोटे होऊ लागतात, तेव्हा खूप त्रास होतो. ते रिप्लाय आता प्रेमाने नाही तर फक्त ‘नाईलाज’ म्हणून किंवा रिप्लाय द्यायचा म्हणून दिला जात आहे असं जाणवू लागतं.
तुम्ही एखादी आनंदाची बातमी सांगण्यासाठी मोठा मेसेज करता आणि समोरून फक्त ‘ओके’ किंवा ‘छान’ असा छोटा रिप्लाय येतो.
आधी जे तासनतास चालणारे ‘लेट नाईट कन्वर्सेशन्स’ natural वाटायचे, आता तिथे मेसेज टाईप करताना तुमचे हात थांबतात. तुम्हाला जाणवू लागतं की तुम्ही त्यांच्या आयुष्यात आता महत्त्वाचे व्यक्ती नसून फक्त एक ‘normal person’ झाला आहात.
अशा वेळी डोकं असंख्य प्रश्नांनी भरून जातं. “माझं काही चुकलं का?”, “मी जास्त काळजी केली का?” किंवा “त्यांना आता माझी पर्वा राहिली नाही का?”
जेव्हा या प्रश्नांची उत्तरं समोरून मिळत नाहीत, तेव्हा ‘शांतता’च त्या प्रश्नांची उत्तरं देऊ लागते. ही शांतता शब्दांपेक्षा जास्त बोचणारी असते.
खरतर, अशा परिस्थितीत माणसाला काही खूप मोठे स्पष्टीकरण किंवा लांबलचक पॅराग्राफ नको असतात. त्याला फक्त इतकंच हवं असतं की, समोरच्याने आपली दखल घ्यावी, आपल्याला धीर द्यावा आणि फक्त एकदा म्हणावं की, “तू अजूनही माझ्यासाठी तितकाच महत्त्वाचा आहेस”.
जेव्हा एखादी व्यक्ती मानसिकदृष्ट्या खचलेली असते, तेव्हा तिला महागड्या gifts नको असतात. तिला फक्त एखाद्याच्या खांद्याची आणि “मी तुझ्यासोबत आहे” या आश्वासक शब्दांची गरज असते.
शेवटी, ही गोष्ट फक्त ‘अटेंशन’ मिळवण्याची नसते. ही गोष्ट असते पुन्हा एकदा कोणालातरी आपली गरज आहे असं वाटण्याची. जेव्हा ही भावना संपते आणि आपण समोरच्यासाठी ओझं झालो आहोत असं वाटू लागतं, तेव्हा आयुष्यातील प्रत्येक छोटी गोष्ट दुःख देऊ लागते. नात्यात संवाद महत्त्वाचा असतो, कारण अबोलपणामुळे अनेकदा जवळची माणसं मनातून कायमची दूर निघून जातात.
- अमृता मोरे



